किल्ले सुधागड
fORT sUDHAGAD
ठिकाण – पाली – रायगड – महाराष्ट्र – भारत
उंची – ५९० मी. (१९३६ फूट)
डोंगररांग – लोणावळा
प्रकार – गिरिदुर्ग
जवळचे गाव – पाली
खूप महिने झाले ट्रेकला गेले नव्हते, म्हणून गिरीदर्शनच्या वेबसाईटवर
कुठले ट्रेक्स जाणार आहेत का ते पाहिलं. एक ट्रेक दिसला.
माझ्या ट्रेक मोहिमेतला सातवा गड आणि आठवा ट्रेक!
किल्ले सुधागड!
०५ नोव्हेंबर २०१७ रविवार.
नेहमीप्रमाणे गिरीदर्शनला फोन करून सीट बुक केली. ट्रेकचे पैसेही लगेच
ऑनलाईन भरले. ट्रेक एक दिवसाचा होता, म्हणून डबा आणायला सांगितला होता. सकाळी ६
वाजता लॉ कॉलेज रोडवरच्या वाडेश्वर रेस्टॉरंटजवळ भेटायचं ठरलं होतं. रविवारी सकाळी
लवकर उठून, डबा घेऊन मी कॅबने ०५.३० लाच वाडेश्वरला पोहोचले. तिथे अजून कोणीच आलं
नव्हतं. मग मी तिथेच वाडेश्वर शेजारीच असलेल्या बिल्डींगच्या पायऱ्यांवर वाट पाहत
बसले. ६ वाजता हळूहळू सगळे आले, गिरीदर्शनचे लीडरपण आले. सुशांत आगाशे आणि
सिद्धांत जोशी, असे दोघे लीडर होते आमच्याबरोबर. आम्ही सगळे मिळून अंदाजे १५ जण
होतो. काही वेळातच आमची ट्रेक बस आली आणि ०६.३० वाजता आम्ही सुधागडला निघालो. अंदाजे
३ तासाचा प्रवास करून आम्ही सुधागडच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावात पोहोचलो.
गावात पोहोचल्यावर तिथेच एका घरात आम्ही नाश्ता केला आणि थोड्याच वेळात आमच्या बॅक
सॅक पाठीवर अडकवून गड चढण्यासाठी सज्ज झालो. गड तसा छोटा आहे. खालूनच गडावरील एका
अवघड ठिकाणी पुढे जायला लोखंडी शिड्या आहेत, त्या दिसतात. आम्ही खालून एक गडाचा
मस्त फोटो काढला आणि चढायला सुरुवात केली.
सुधागड
म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी
स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव
सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड
विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. सुधागड
हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही
२२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच
जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख
आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. १६४८ साली हा किल्ला
स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ
लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या
हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून
त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने
पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले
तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले.
उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या
गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण
केले. १६४८ मध्ये हा गड शिवरायांच्या अधिपत्याखाली आला. राजधानीसाठी याही गडाचा
विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले
जाते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या
गावातच छत्रपती संभाजी राजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती.
महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा
मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद
पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणार्या परळी गावात
हत्तीच्या पायी दिले.
सुरुवातीलाच काही अंतरावर थांबून नेहमीप्रमाणे गोल करून आपापली ओळख
करण्याचा कार्यक्रम पार पडला. लीडरने नेहमीच्या ट्रेक सूचना दिल्या आणि आम्ही पुढे
चालू लागलो. साधारण अर्धा रस्ता पार केल्यानंतर एका ठिकाणी दगडाचा उभा पॅच लागतो.
दोर घेतल्याशिवाय चढता येत नाही पण तिथे एकापुढे एक अशा २ शिड्या ठोकल्या आहेत,
त्यामुळे चढायला सोपे झाले. मग आम्ही एका पाठोपाठ एक असे शिड्यांवरून पुढे चढलो. सर्वात
शेवटच्या टप्प्यावर गडाचा भरभक्कम बुरुज दिसला. त्याच्या बाजूला चढायला दगडी
पायऱ्या आहेत. २ पायऱ्यांच्या मध्ये अंतर नेहमीपेक्षा जास्त असल्यामुळे चढताना
थोडा त्रास जाणवायला लागला होता. थोडा दमही लागला होता. मग मी हळूहळू चढून तो
टप्पा पूर्ण केला आणि एकदाचा गड सर झाला. आम्ही सगळे अंदाजे ०१.३० तासात गडावरती
पोहोचलो. गड खूप प्रशस्त आहे. तिथे एक वाडापण आहे, जिथे एक कुटुंब राहतं. आम्ही
त्या वाड्यात जाऊन आधी जेवण केलं आणि मग गड फिरायला निघालो. या गडाचा घेरा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक
तलाव आढळतात. गडावर पंत सचिवांचा वाडा आहे, तसेच
भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही बर्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या
परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाड्याच्या
बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे.
सचिवांच्या वाडापासून पुढे पायर्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात.
जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांतील पाणी
पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही चोर दरवाज्यांकडे जात असे.
ही वाट आता अस्तित्वात नाही.
·
पाच्छापूर
दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर
माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच
धान्याची कोठारे, भाडांचे टाके, हवालदार
तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
·
गडावरील
टकमक टोक : वाड्यापासून आपण पायर्यांच्या साहाय्याने वर आले
की उजवीकडची वाट हत्तीपागांमधून जाऊन,
सरळ एका टोकावर
पोहोचते. रायगडावरील 'टकमक'
टोकासारखेच हे
टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैल-बैला दिसतो.
तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
·
दिंडी
दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट दिंडी दरवाज्यात
आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाजा’ची
हुबेहूब प्रतिकृती आहे. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी
बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले
आहे. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून
संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या
मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे.
·
सवाष्णीचा
घाट : तैल-बैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे
गावी यावे. तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. या वाटेने आपण दिंडी दरवाजात
येतो.
·
नाणदांड
घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळतीकडे निघावे.
पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो. पुढे एक बावधान गाव आहे. तेथून पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.
संपूर्ण गड फिरून, भरपूर फोटो काढून आम्ही उतरायला सुरुवात केली.
चढायला जितका वेळ लागतो, साधारण तितकाच वेळ उतरायला लागला. खाली येऊन आमच्यापैकी
काही जणांनी चहा, तर काही जणांनी कोल्ड ड्रिंक प्यायलं. थंड पिऊन खूप छान वाटलं
मला. अर्धा तास तिथेच बसून आम्ही काही वेळातच बसने परत पुणे प्रवास सुरु केला. अशा
प्रकारे माझा हा छोटासा पण अविस्मरणीय ट्रेक संपन्न झाला.
असा हा श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श
झालेला प्रशस्त, सुंदर आणि आजूबाजूच्या गडांनी घेरलेला -
किल्ले सुधागड!
पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
No comments:
Post a Comment