किल्ले माहुली
fORT mAHULI
ठिकाण – माहुली – आसनगाव – ठाणे – महाराष्ट्र – भारत
उंची – ८५८ मी. (२८१५ फूट)
डोंगररांग – शहापूर
प्रकार – गिरिदुर्ग
जवळचे गाव – शहापूर
बांधकाम – मुघल
संरक्षित स्मारक - १९ मार्च १९१०
खूप दिवस झाले होते ट्रेकला गेले नव्हते, म्हणून नेटवर ट्रेक सर्फिंग
केलं. त्यात दोन पर्याय दिसले, एक होता हरिश्चंद्रगड ट्रेक व दुसरा गिरीदर्शन
ट्रेक ग्रुपचा माहुली. हरिश्चंद्रगडाचं नाव याआधी ऐकलं होतं, पण माहुलीचं कधी ऐकलं
नव्हतं. हरिश्चंद्रगडला जायची संधी मिळावी, असं वाटत होतं. मग मी दोन्ही ग्रुप्सना
फोन केला, तर दोघांनीही सीट फुल असल्याचं सांगितलं. मन उदास झालं. मग दोघांनाही
रिक्वेस्ट केली, की “एक जरी सीट रिकामी झाली तर पहिला कॉल मला करा.” गुरुवारी
दुपारी गिरीदर्शनचा फोन आला. त्यांनी सांगितलं, “माहुलीसाठी एक सीट रिकामी आहे,
तुम्ही येऊ शकता.”
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे!
माझ्या ट्रेक मोहिमेतला दुसरा गड आणि तिसरा ट्रेक!
किल्ले माहुली!
१५ जानेवारी २०१७ रविवार.
ट्रेकचे पैसे अजून भरले नव्हते. गिरीदर्शनच्या ऑफिसमध्ये फोन केला, तर
त्यांचा लीडर सुशांत आगाशे म्हणाला, “पैसे आदल्या दिवशी रात्री पिक अप पॉईंटला
दिले तरी चालतील.”
शनिवारी सकाळी ऑफिसमध्ये जातानाच ट्रेकचे कपडे सोबत घेतले होते.
संध्याकाळी ऑफिसमध्येच कपडे बदलले. लॉ कॉलेज रोडवरच्या वाडेश्वर रेस्टॉरंटजवळ
भेटायचं ठरलं. तिथेच शेजारच्या गल्लीमध्येच गिरीदर्शनचं ऑफिस आहे, हे कळलं. ०९.४५
ला वाडेश्वरला पोहोचले. मला वाटलं मलाच उशीर झाला; पण ट्रेक सवंगड्यांपैकी कोणीही अजून
आलं नसावं, असं वाटत होतं. मग मी सुशांतला कॉल करून मी आल्याचं सांगितलं, तर तो
म्हणाला “तुम्ही तिथेच थांबा, आम्ही तिकडेच येत आहोत.” काही वेळानंतर सगळे हळूहळू
येत होते. लीडर तर जवळजवळ १०.३० ला आले. एकूण १०-१२ लीडर असावेत आणि ट्रेक सवंगडी
अंदाजे ४०-५०. सगळेच अनोळखी. पण मग विचार आला, की ट्रेक दरम्यान ओळख होईलच
नेहमीप्रमाणे.
सुमारे ११.३० ला ट्रेक बस वाडेश्वरहून निघाली. ४-५ तासांचा तरी प्रवास
असावा. प्रवासात नेहमीप्रमाणे मी एक मस्त झोप काढली. पहाटे अंदाजे ४ च्या सुमारास गडाच्या
पायथ्याजवळ असलेल्या शहापूर गावात पोहोचलो असू. पहाटेचा अंधार असल्यामुळे बाहेरचं
काहीच दिसत नव्हतं. जानेवारी महिना असल्यामुळे थंडी भरात होती. सगळीकडे धुकं पसरलं
होतं. आम्ही सगळे कुडकुडतच बसमधून खाली उतरलो. जवळच एक मंदिर होतं. लीडरने आम्हाला
सकाळ होईपर्यंत मंदिरातच आराम करायला सांगितला. २ तास मस्त झोप काढली. सकाळी ६
वाजता आम्ही सगळे उठलो. मी बाहेर येऊन पाहिलं, तर काय!
अंधारात जो दिसला नाही तो अगदी नजरेच्या टप्प्यात दिसला.
माहुली!
अबबब! केवढा प्रचंड गड!
उत्सुकता सातव्या आसमानावर गेली होती. कधी ट्रेक सुरू होतोय, असं झालं
होतं. लीडरने गडाची माहिती दिली. खरंतर माहुलीचे दोन खोगीरामुळे ३ भाग पडले आहेत.
उत्तरेचा पळसगड, मधला माहुली आणि दक्षिणेला भंडारगड. काय सुंदर दृश्य होतं ते. लांबून
एक मस्त माहुलीचा फोटो मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढला. मग फ्रेश होऊन, नाश्ता करून
बरोबर ९ वाजता माहुली चढायला सुरुवात केली. काही अंतरावर गेल्यावर एका मोकळ्या
जागी सगळे गोल करून थांबलो. लीडरने सगळ्यांना आपापली ओळख करून द्यायला सांगितली. मग
ट्रेकच्या सूचना केल्या. माहुली परिसरातही पक्षी असल्यामुळे “आवाज करून त्यांना
त्रास होऊ देऊ नये”, हे खास करून सांगितलं आणि आमचा ट्रेक सुरू झाला.
मध्येच जंगल, मध्येच पायवाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस, तर काही ठिकाणी
उंच-सखल वाट; अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या वाटेवरून माहुलीकडे चढाई सुरू झाली. आमचा
खूप मोठा ग्रुप होता. सगळेच आपापल्या गतीने पुढे जात होते. गड चढायला तसा सोपा
आहे, पण दम खायला लावणारा आहे. गड अगदी थोड्याच अंतरावर राहिला असतांना एके ठिकाणी
मला जरा जास्तच थकायला झालं. वाटलं, इथेच थांबावं. सगळे परतायला लागले, की
त्यांच्यासोबत खाली यावं. मग माहुलीच्या वरच्या झेंड्याकडे पाहिलं. वाटलं, इतकं
आलो आणि इथूनच परत फिरायचं? हळूहळू जायचं पण गड सर करायचाच. १५-२० मिनिटं तिथेच
थांबले. थोडं पाणी पिऊन दम खात बसले. तेवढ्यात मागून सतीश मराठे सर, जे लीडरपैकी
सिनियर होते, ते ३ जणांना घेऊन येत होते. ते सुद्धा माझ्याप्रमाणेच थोडे थकलेले
दिसले. मग हायसं वाटलं. मनात म्हणलं, “चला, कोणीतरी आहे आपल्यासोबत.” काही वेळाने
आम्ही पाच जण पुढच्या चढाईला लागलो. थकवा खूप जाणवत होता. ऊन पण खूप जास्त होतं,
त्यामुळे जास्तच थकवा आला होता. माझ्याकडचं पाणी थोडंच राहिलं होतं, म्हणून मग मी
सतीश सरांना पाणी मागितलं. तर त्या तिघांपैकी एकाने पाणी दिलं. द्यायच्या आधी
सांगितलं, “हे जिवंत बेडकाच्या तळ्यातलं पाणी आहे.” मग मी म्हणाले, “चालेल, बेडूक
जिवंत होता ना, मग चालेल”. हे ऐकून सगळेच हसले. पाणी पिऊन मग आम्ही राहिलेले अंतर
सलग चढलो. शेवटी एकदाचे गडावर पोहोचलो.
हुश्श झालं!
चेहऱ्यावर समाधान जाणवत होतं आणि माहुली सर केल्याचा परमानंद.
माहुलीवरून आजूबाजूला असलेल्या निसर्गसौंदर्यामुळे आलेला थकवा कुठल्याकुठे पळून
गेला. खालून पाहिलं तर दोन प्राणी जवळ बसलेले आहेत असे माहुलीचे टोक दिसते. पळसगड,
माहुली आणि भंडारगड हे दुर्गत्रिकुट वेड लावणारे आहे. प्रेमात पाडणारे आहे. हे
दुर्गत्रिकुट मिळून बळकट ठाणे तयार झाले आहे. इतर
अनेक किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली हे ज्ञात नाही. पण
१४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले.
पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना
संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५-३६ च्या सुमारास
शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर-शिवनेरीहून जिजाबाई व बाळ
शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला
वेढा घातला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली, पण त्यांनी मदत करण्यास नकार
दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनी हा
किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. १६६५
च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा
मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर
बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या
नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी
तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या
यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा
किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर दोनशे
मोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे
त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. आसनगावमार्गे माहुली गावातून शिडीच्या
वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. पाच मिनिटांवर आणखी एक
पाण्याचे टाके आहे. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. समोरच
ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसा राशी, अलंग,
मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा,
दक्षिणेपूर्वेला माथेरान रांग, दक्षिणपश्चिमेला तानसा खोरे,
तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलुख दिसतो. शिडीच्या वाटेने दोन मिनिटे पुढे
गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर
आहे. पुढे वाड्याचे काही अवशेष आढळतात. समोरच पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे
गेल्यावर जांभळाचे रान लागते. ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली
आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते
६०० फुट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून गडावर यायचे
झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमाही
पाण्याचे भुयारी टाके आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच
भंडारगडावर घेऊन जाते. भंडारगडावरून समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात.
समोरच उजवीकडे असणाऱ्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्या परिसराचे
दृश्य अतिशय रमणीय असते.
तसं पाहता गडावर जाण्याच्या २ वाटा आहेत.
१. आसनगाव मार्गे : मुंबई-नाशिक
लोहमार्गावरील आसनगाव गाठावे. इथून ५ कि.मी. अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या
माहुली या गावी पायी अथवा रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर
मंदिर आहे. रात्री तेथे राहण्याची सोय होते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३
कि.मी. चा खडा चढ चढून जावे. वाटेत एक लोखंडी शिडी आहे. ती पार करून वर गेल्यावर
समोरच पाण्याची दोन टाकी दिस्तात. या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.
२. वाशिंदमार्गे : लोकलने किंवा
एस.टी. ने वाशिंदला उतरावे. उत्तरेला दहागाव आणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा.
चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्या दक्षिण टोकापासून निघालेल्या व पश्चिमेला
पसरलेल्या सोंडेवर चढावे. सोंडेवरून नवरा-नवरी सुळके उजवीकडे ठेवत. अवघड श्रेणीचा
कातळटप्पा चढून कल्याण दरवाजाने भंडारगडावर प्रवेश करावा. कल्याण दरवाजावर एक
शिलालेख आढळतो. ही वाट खूप अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे साहित्य जवळ असणे आवश्यक
आहे.
भंडारगडावर राहाण्याची कोणतीही सोय नाही. किल्ले माहुलीवर राहाण्यासाठी
पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. शक्यतो हा ट्रेक एक दिवसाचाच करावा, कारण
किल्ल्यावर जेवणाची सोय आपल्यालाच करावी
लागते. किल्ले माहुलीवर पहारेकऱ्यांच्या देवड्यासमोर पाण्याचे टाके आहे. येथील
पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे
तेथे असताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा. किल्ल्यावर जाण्यासाठी आसनगाव मार्गे दोन
तास कल्याण दरवाजा मार्गे ६ ते ८ तास लागतात.
संपूर्ण गड फिरून झाल्यावर आम्ही सगळे जेवायला बसलो. लीडरने आम्हाला
सोबत आणलेली ताट-वाटी काढायला सांगितले. पण मी ताट-वाटी विसरले होते, त्यामुळे माझ्याकडे
काहीच नव्हतं. मग जया म्हणाली, की तू आमच्याबरोबर जेव. अरे हो! जया म्हणजे ज्या
एका ठिकाणी मी थकून थांबले होते, त्या ठिकाणी मागून सतीश मराठे सरांसोबत जे ३ जण
आले होते, त्यापैकी एक. दुसरा नितीन आणि तिसरा तुषार. माझ्याप्रमाणेच छंदिष्ट
ट्रेकर्स. तिथेच आमची तिघांची ओळख झाली. मग मी, जया आणि नितीन एका ताटात जेवलो. आम्हाला
असं वाटत होतं, जसं आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत आहोत. इतकी छान ओळख झाली
आमची. म्हणतात ना, कधी कधी काही क्षण पुरतात चांगली ओळख व्यायला. आमचं असंच झालं
होतं. गिरीदर्शनकडून आम्हाला आम्रखंडाची स्वीट डिश होती. यम्मी! जेवण झाल्यावर मी
आणि जयाने फोटो काढले. गडावर गुहा आहे, तिथे नितीन आणि तुषार जाऊन झोपले. पण मी
आणि जया मात्र गड फिरायला गेलो. झेंड्यापर्यंत जाऊन फोटो काढले. छान वाटलं. मग
थोड्या वेळाने लीडरने भंडारगडला जायचं आहे असं सांगितलं. पण वेळ कमी होता आणि वेग
जास्त हवा होता. म्हणून “ज्यांना भरभर चालण्याची ताकद आहे, त्यांनीच यावे”, अशी
सूचना लीडरने केली. मी खूपच थकले होते, म्हणून मग मी नाही गेले भंडारगडला. जया पण
माझ्यासोबत माहुलीवरच थांबली. आमच्यासोबत काही ट्रेक सवंगडी होते. मग अर्धे लीडर
एका ग्रुपसोबत भंडारगडावर गेले आणि बाकीच्या लीडरनी आमच्या ग्रुपबरोबर माहुली
उतरायला सुरुवात केली. “भंडारगडावर गेलेला ग्रुप आपल्याला नंतर जॉईन करेल”, असे
लीडरने सांगितले.
चढाई दमखाऊ झाल्यामुळे मला उतरतानाही खूप त्रास होत होता. पाय खूप
दुखत होते. त्यामुळे वेगही मंद झाला होता. शेवटी खाली आल्यावर दीर्घ श्वास घेतला. सगळेच
खूप थकले होते. आम्ही खाली येईपर्यंत भंडारगडावर गेलेला ग्रुप आम्हाला जॉईन झाला
होता. मग आम्ही सगळ्यांनी चहा प्यायला. संध्याकाळची न्याहारी केली आणि पुण्यास
जाण्यास निघालो.
निसर्गसौदर्याने नटलेला, एकदाच काय पण अनेकदा भेट घ्यावी असा माहुली
आणि राहिलेले पळसगड आणि भंडारगडचे ते सुंदर ४ सुळके पाहायला मी नक्कीच परत जाणार.
असा हा ट्रेकर्सचा आवडता. तसेच ज्यामुळे मला जया सारखी छान मैत्रीण
मिळाली, असा हा सुंदर -
किल्ले माहुली!
पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
No comments:
Post a Comment