Tuesday, 15 May 2018

किल्ले विसापूर! Fort Visapur!

किल्ले विसापूर
fORT  vISAPUR


ठिकाण – लोणावळा – पुणे – महाराष्ट्र – भारत
उंची – १०८४ मी. (३५५६ फूट)
डोंगररांग –
प्रकार – गिरिदुर्ग
जवळचे गाव – मळवली, लोणावळा 
बांधकाम – पेशवे बाळाजी विश्वनाथ


नेहमीप्रमाणे इंटरनेटवर ट्रेक सर्फिंग करताना गिरीदर्शनचा ट्रेक दिसला.
माझ्या ट्रेक मोहिमेतला पाचवा गड आणि सहावा ट्रेक!
किल्ले विसापूर!
१८ जून २०१७ रविवार.
याला संबळगड असेही म्हणतात. लोहगडाला संरक्षित ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा गड लोहगडवाडीच्या डावीकडे आहे. मागे लोहगडला गेले होते, तेव्हा विसापूर पहिला होता, पण फक्त दुरूनच. तेव्हाच ठरवलं होतं, की जेव्हा संधी मिळेल विसापूर पाहायचाच आणि ती संधी आता चालून आली होती.
गिरीदर्शन ग्रुपसोबतचा हा माझा दुसरा ट्रेक. रविवारी सकाळी ६ वाजता शिवाजीनगर स्टेशनला भेटायचे ठरले होते. मी पिंपळे गुरववरून कॅबने शिवाजीनगर स्टेशनला पोहोचले. बरेच ट्रेक सवंगडी तिथे जमा झाले होते. लीडर सुशांत आगाशेला मी माझी प्रेझेंटी दिली. ट्रेकचे पैसे दिले. यावेळेस भरपूर संख्येनी ट्रेकर्स आले होते. लीडर्सपैकी ओळखीचे चेहरे दिसत होते, सुशांतसोबत सारंग ढेरे, सिद्धांत जोशी, सतीश मराठे सर आले होते. मी ट्रेकर्समध्ये कोणी ओळखीचं दिसतंय का ते पाहत होते. तेवढ्यात एक मुलगी ओळखीची दिसलीच. ती पण माझ्याकडे पाहत होती. मग आम्ही एकमेकींना विचारले, की “याआधी कोणत्या ट्रेकला आपली भेट झाली होती?” मग खूप विचार केल्यानंतर आठवलं. माहुली ट्रेकला भेट झाली होती आमची. तिचं नाव ऋचा मोकाशी. तिनेही माझं नाव विचारलं. मग आम्ही एकमेकींना म्हणालो, “बरं झालं, कोणीतरी ओळखीचं भेटलं.” पूर्ण ट्रेकभर आम्ही एकत्रच होतो. काही वेळाने सुशांतने आम्हा सगळ्यांना सांगितलं, की “०६.३० वाजताची लोणावळा जाणारी लोकल आपल्याला पकडायची आहे. तर सगळ्यांनी जो डबा मिळेल, त्या डब्यात चढावे. मळवली स्टेशनवर आपल्याला उतरायचे आहे.” आम्ही सगळे मिळून १०५ जण होतो. इतक्या मोठी संख्या असणारा हा माझा पहिलाच ट्रेक होता.
०१.३० तास प्रवास करून आम्ही मळवली स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवरून आम्ही सगळे पायी चालत विसापूरच्या थोडं अलीकडे एका ठिकाणी आम्ही सगळ्यांनी गिरीदर्शनने आणलेला टेस्टी नाश्ता केला, त्यावर चहा-कॉफी प्यायली. मग सतीश मराठे सरांनी नेहमीप्रमाणे ट्रेकसाठीच्या सूचना केल्या. सर आमच्याबरोबर विसापुरला येणार नव्हते, बाकी लीडर्स आमच्याबरोबरच होते.
आम्ही सगळे ट्रेक सवंगडी एकमेकांच्या पाठोपाठच चालत होतो. आधी आम्ही सगळे भाजे लेणी पाहायला गेलो. मी लोहगडच्या वेळी भाजे लेणी पाहिल्यामुळे मी एका जागीच बसून होते. बाकी सगळे ट्रेक सवंगडी, ज्यांनी लेणी पाहिली नव्हती ते लेणी फिरून आले. मग आम्ही सगळ्यांनी मधोमध असलेल्या चैत्यगृहाच्या पायऱ्यांवर बसून ग्रुप फोटो काढला. लगेचच मग आम्ही भाजे लेण्यांचं तिकीटघर आहे, तिथूनच बाजूने वर चढायला सुरुवात केली. सुरुवातीलाच मला थोडा मदतीचा हात लागला, मग मला सारंगने मदत केली. नंतर मग मदत न घेता सलग चढले. थोडं अंतर चढल्यावर पठार आहे. चढताना पाय घसरला जातो, म्हणून सावकाश पाय घट्ट ठेऊन चढावे लागते. मग थोडावेळ आम्ही त्या पठारावरच आराम केला.
तिथूनच मागे पाहिलं, विसापूर दिसत होता. असं वाटत होतं, कधी पोहोचते गडावर. त्याआधी त्या पठारावरच मी आणि ऋचासोबत अजून एका ट्रेकरने फोटो काढले. नंतर सुशांतने आम्हा सगळ्यांना गोल करून उभं राहायला सांगितले व गिरीदर्शनची नेहमीची जय शिवाजी! जय भवानी! ची घोषणा दिली आणि ट्रेक परत सुरू केला. आमच्यामध्ये २ छोटे लीडर्सपण होते, पण ते छोटे लीडर्स मोठ्यांप्रमाणेच अगदी एक्स्पर्ट आणि जोश्यात होते.
थोडं चालल्यानंतर जंगलाचा रस्ता लागतो. पावसाळ्यात तर गडावरून धबधबा पडत असतांना त्यातून चढत जावं लागतं. फार मजा येत असणार पावसात तर! पुढे गेल्यावर काही अंतरापर्यंत छोटे-मोठे दगड आहेत. या दगडांच्या मधून जाणारी वाट मस्तच आहे. मध्येच छोटे-छोटे रॉक पॅच आहेत. तिथून वरती पहिले, तर विसापूरची तटबंदी दिसायला लागते. खालूनच तटबंदी असल्याची वाटते. शेवटच्या टप्प्यात पायऱ्या सुरू होतात. पावसात या पायऱ्यांवरून पाणी वाहत खाली येते. त्या वाहत्या पाण्यात गडावर पोहोचणे थोडे अवघड वाटते, पण कठीण नाही. त्यातही मजा येत असेल. खरतर जून महिना होता आणि आम्ही सगळे पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो, पण आज सकाळपासून पावसाने कुठे दडी मारली होती कोण जाणे! चक्क ऊन पडलं होतं. अंदाजे ०१.३० तासात आम्ही गड चढून वर पोहोचलो.
वर पोहोचल्यावर आम्ही थोडा वेळ बसून आराम केला. ज्यांना भूक लागली होती, ते खाण्यासाठी जे आणलं ते खात बसले. मी आणि ऋचा पण खूप भूक लागल्यामुळे आम्ही आणलेला डबा खाल्ला. मग सुशांतने सगळ्यांना “आता आपण आधी जेवण करूया आणि मग गड फिरायला जाऊ”, असे सागितले. मग सगळे एका वास्तुशेजारी असलेल्या सपाट जागेवर बसून गोल करून जेवायला बसले. मी आणि ऋचा डबा खाल्ल्यामुळे गड फिरण्यासाठी गेलो.
कित्ती प्रचंड मोठ्ठा गड आहे! अबबब! प्रशस्त.
विसापुरला चढायला २ मार्ग आहेत. एक भाजे लेणीच्या डावीकडून आणि दुसरा लेण्यांच्या उजवीकडून जो थोडा कठीण आहे. मला आणि ऋचाला ५०% गड फिरायला आणि लोहगडच्या दिशेला असलेल्या झेंड्यापर्यंत पोहोचायला तब्बल २ तास लागले. मध्येच वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढण्याचा कार्यक्रम होत होता. संपूर्ण गड पाहायला अंदाजे ४ तास लागत असावेत. झेंड्याजवळ जाऊन झेंड्यासोबत सेल्फी काढले. काहीच दिवसापूर्वी मी लोहगडावरून विसापूर पहिला होता आणि आता विसापूरवरून लोहगड पाहत होते. लोहगड ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या. मग आम्ही आजूबाजूचा परिसर पाहून परत त्या वास्तुजवळ जाण्यासाठी निघालो, जिथे आमचे ट्रेकमेट्स जेवायला बसले होते.
गडावर छोटा डोंगर आहे, मंदिर आहे. काही वास्तूंचे भग्न अवशेष आहेत. तटबंदी सर्व बाजूंनी नाही, पण जेवढी आहे तेवढी मजबूत आहे. दूर लांबवर लोकलपण दिसली. पावसाळा असल्यामुळे आजूबाजूला हिरवळ पसरली होती.
पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे.
गड फिरून झाल्यावर तासभर तिथेच बसून काही जण आराम करत होते, तर लीडर बाकीच्या ट्रेकर्ससोबत खेळ खेळले. मी बाकी वास्तू पाहायला, त्यांचे फोटो काढायला थोड्या अंतरावर फिरून आले. काही वेळानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. मला पाय घसरण्याचा थोडा Phobia असल्यामुळे उतारावर थोडं हळूहळू उतरले. खाली आल्यावर अजून एक गड सर केल्याचं समाधान मिळालं. मळवलीवरून गाडी न पकडता लोणावळ्याची गाडी पकडून परत त्याच गाडीने शिवाजीनगरला आम्ही सगळे ट्रेकर्स समाधान आणि आनंद भरलेल्या मनाने निघालो.

असा हा भव्यदिव्य!
किल्ले विसापूर!

पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!




































No comments:

Post a Comment