किल्ले राजा हरिश्चंद्रगड
fORT rAJA
hARISHCHANDRAGAD
ठिकाण – पाचनई –
अहमदनगर – महाराष्ट्र – भारत
उंची – १२१९ मी.
(४००० फूट)
डोंगररांग –
हरिश्चंद्र
प्रकार –
गिरिदुर्ग
जवळचे गाव –
पाचनई
Group – Trekker
Bugs
मागच्याच
महिन्यात ‘ट्रेकर बग्स’सोबत घनगडला गेले होते, तेव्हा आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार
झाला होता. लीडर अक्षयने सांगितलं होतं, की “ट्रेक संपला तरी ग्रुपमधून आउट होऊ
नका. पुढचे ट्रेक अपडेट्स ग्रुपवरच मिळतील.” त्याप्रमाणे ग्रुपवर एक दिवस पुढच्या
ट्रेकचा मेसेज आला आणि OMG! मी काही वेळासाठी जागेपणीच स्वप्नात शिरले. कारणच तसं
होतं. जो फक्त स्वप्नातच पाहत होते, जो करण्याचे कितीतरी महिन्यांपासून काय तर एक
वर्षापासून मनात होते, जो दोन वेळा संधी येऊनही करायला जमला नव्हता म्हणून
वाईटाहून वाईट वाटलं होतं, जो ट्रेकर्सचा ‘Dream Trek’ आहे; असा गड मला आता करायला
मिळणार आणि माझं स्वप्नं पूर्ण होणार या विचारातच काही क्षण मी गढून गेले. असा हा
गडांचा राजा, गडांचा गड – माझा तिसरा नाईट ट्रेक आणि
माझा ट्रेक
मोहिमेतला नववा गड आणि तेरावा ट्रेक!
किल्ले राजा
हरिश्चंद्रगड!
०५-०६ मे २०१८ शनिवार-रविवार.
खरंतर मे महिना
असल्यामुळे शक्यतो इतक्या प्रचंड उन्हात एवढा मोठा गड चढणे म्हणजे ताकदीची
परीक्षाच असते, पण प्लॅन खूपच छान होता. ग्रुपवरच अक्षयला विचारलं, “कोणत्या
मार्गाने गडावर जायचे आहे?” तर तो म्हणाला, “पाचनईच्या.” मनाला हायसं वाटलं आणि
आनंदही झाला, कारण चढाई रात्री करायची होती. अरे वाह! पाचनईचा मार्ग सोपा, कमी वेळ
घेणारा आणि त्यात आणखीन छान म्हणजे रात्री चढायचं! मागच्याच वर्षी माहुली
ट्रेकच्या वेळेला हरिश्चंद्रला जायची संधी हुकली होती, तेव्हा खूप वाईट वाटलं
होतं. नंतर वाटायचं, की कधी या गडावर जायला मिळेल की नाही. पण आता ही इतकी सुंदर
संधी मिळाल्यानंतर वाटलं, की ‘मनात इच्छा असेल, तर ती पूर्ण होतेच, फक्त योग्य वेळ
यावी लागते” आणि ती योग्य वेळ आत्ता आली होती. ट्रेकचा दिवस येईपर्यंत मी
त्याच्याच धुंदीत होते.
आणि तो दिवस
उजाडला. आदल्या दिवशी सकाळीच ऑफिस जाण्याच्या आधी ट्रेकची बॅक सॅक पॅक करून ठेवली,
तसं मी त्या दिवशी लवकरच ऑफिसमधून निघणार होते पण कामामुळे उशीर झाला तर सगळी घाई
होईल या विचाराने सकाळीच तयारी करून ठेवली. रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणेच
कोथरूडला नळ स्टॉपजवळ भेटायचे ठरले होते. ट्रेक सवंगडी एकूण २२ जण होतो, आमचे दोन
लीडर्स रसिका आणि अक्षय धरून. त्यातले बरेच कोथरूडला भेटणार होते आणि बाकीचे नाशिक
फाट्याजवळ. मी माझ्या ट्रेक स्टिक सोबत ०७.३० वाजता कॅब पकडून नळ स्टॉपजवला
पोहोचले. मी नाईट ट्रेक असला तर स्टिक सोबत घेऊन जाते, जी मला एका तुटलेल्या
झाडामुळे मिळाली होती. ती स्टिक नंतर खूप प्रसिद्ध आणि माझी ओळख कशी झाली, हे नंतर
कळेलच. रसिका आणि बरेच ट्रेक सवंगडी आधीच तिथे आले होते. कोणी ओळखीचं दिसतंय का
म्हणून पाहत होते, तर एक मुलगा होता ज्याला मी घनगड ट्रेकला बघितलं होतं. पण
त्याची ओळख नव्हती झाली, त्यामुळे बोलणे झाले नाही. हाय, हेलो झाल्यानंतर आम्ही
ट्रेक बसची वाट पाहत तिथेच उभे होतो. माझ्यानंतर ५ मिनिटांतच बस आली, पण आणखीन २-३
जण यायचे बाकी होते. साधारण १५-२० मिनिटांत तेही पोहोचले आणि आमची बस अंदाजे ०८.४५
वाजता नळ स्टॉपवरून निघाली. दरम्यान मी आणि रसिका बोलत होतो. मी आणलेले चॉकलेट
तिच्यासोबत शेअर करून, गप्पा मारत आम्ही एकदाचे नाशिक फाट्याला अंदाजे ०९.३० वाजता
नाशिक फाट्याला पोहोचलो. तिथून बाकीचे ट्रेक सवंगडीपण बसमध्ये चढले. त्यामध्ये एक
छोटासा मुलगा पण होता, जो फक्त ६ वर्षांचा होता. ग्रुपवर एक-एक मेंबर अॅड होताना
एकाने मेसेज टाकला होता, की “६ वर्षांचा मुलगा पण आलेला चालेल का?” मग लीडरने हो
सांगितलं होतं, त्यामुळे त्या छोटुला बघायची एक्सायटमेंट होतीच. तोही तिथूनच चढला.
कित्ती cute होता तो. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचे गाल ओढले आणि त्याला
लगेच नावही विचारले, तो म्हणाला “प्रचेत”. त्याला पाहून खूप कौतुक वाटले. काही
वेळानंतर घनगड ट्रेकचे दोन सवंगडी, ज्यांची ओळख झाली होती ते म्हणजे करुणा आणि
हर्ष पण या ट्रेकला आहेत हे पाहून अत्यानंद झाला. ते दोघेही मला पाहून आनंदित
झाले. ते आल्यानंतर आमची बस तिथून सरळ अहमदनगरकडे निघाली.
एक सुमन म्हणून
लेडीज आल्या होत्या. त्या खरंतर ऑस्ट्रेलियावरून सुट्टीसाठी पुण्याला आपल्या
बहिणीकडे आल्या होत्या, पण त्यांच्या बहिणीची मुलगी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ट्रेकला
जाणार होती, म्हणून यासुद्धा आपल्या मुलीला घेऊन ट्रेकला आल्या. ऐकून त्यांचेही
कौतुक वाटले. त्यांच्या मनात खूप एक्सायटमेंट आणि थोडी भीती या दोन्ही मिश्र भावना
होत्या. काही वेळ माझ्या शेजारच्या सीटवर बसून, माझ्याशी गप्पा मारून मग त्या मागे
त्यांच्या ग्रुपसोबत जाऊन बसल्या. मग मला मिळालेली अख्खी सीट, प्रवास एन्जॉय करत
बाहेर पाहत, मध्येच करुणा-हर्ष-अक्षय-रसिका यांची मजा-मस्ती ऐकत-बघत ट्रेकच्या
विचारात रमून गेले. थोड्या वेळानंतर मागे बसलेल्या ग्रुपने त्यांच्यापुरती गाणी
लावली होती, ज्याचा आवाज आमच्यापर्यंत थोडासुद्धा येत नव्हता त्यामुळे आम्हा पुढे
बसणाऱ्यांना खूप बोअर व्हायला लागलं होतं. म्हणून मग मी अक्षयला सांगितलं, की
त्यांना जाऊन सांग, की “आवाज थोडासा मोठा केला तरी चालेल, आम्ही पण गाणी ऐकू.” मग
त्यांनी सांगितलं, की “तुमच्याकडे गाणी असतील, तर लावा. आमची गाणी आम्ही बंद
करतो.” मग करुणाने तिच्या मोबाईलमधली गाणी लावली आणि शांत प्रवासात जान टाकली. मग
कधी हिंदी रॉक, पंजाबी हिट तर कधी इंग्लिश गाणी ऐकून, जागेवरच नाचत, मजा-मस्ती करत
आमचा पुढचा संगीतमय प्रवास सुरू राहिला.
साधारण दीड
तासाच्या अंतरावर पेट्रोल भरण्यासाठी बस थांबली. मग आम्ही पाय मोकळे करण्यासाठी
खाली उतरलो. तिथेच पेट्रोल पंपला लागुनच एक पानाचे मोठे दुकान होते. करुणाने
सगळ्यांना विचारले, की “पान कोणाला खायचे आहे का?” ज्यांना खायचे होते ते त्या
दुकानात गेले, त्यात मीही होतेच कारण पान म्हणजे माझे आवडते खाद्य. असे अचानक अनपेक्षित
असे खायला मिळाले, की मनाला जो परमानंद होतो तो मला पान खाऊन झाला होता. पान खाऊन
आम्ही सगळे बसमध्ये येऊन बसलो. अक्षयने एक एक्स्ट्रा पान आणले होते, ते पण मी
खाल्ले. एक पे एक मुफ्त! मुफ्त! मुफ्त! वाह! पान खात खात पुढचा प्रवास सुरू
राहिला. काही वेळानंतर बरेच जण झोपायला आले होते, पण गाणी चालू असल्यामुळे धड कोणी
झापत नव्हते आणि जागे पण नव्हते. नाईट ट्रेक असल्यामुळे थोड्या झोपेची गरज होती.
म्हणून मग मी रसिकाला मेसेज करून “गाणी बंद करून थोडी झोप घेऊया” असे सांगितले.
तिने अक्षयला सांगून त्याने काही वेळातच गाणी बंद केली आणि ज्यांना झोप येत होती,
ते झोपी गेले. त्यात साहजिकच मी पण सामील आहेच. अंदाजे पहाटे ३ वाजता मला जाग आली
असावी. आजूबाजूला पाहिले, तर बरेच जण गाढ झोपेत होते, अक्षयही शेजारच्या सीटवर गाढ
झोपला होतं. करुणा-हर्ष आणि रसिका मात्र पुढे ड्रायव्हर काकांशेजारी बसून बोलत
होते, कदाचित ड्रायव्हर काकांना झोप येऊ नये म्हणून ते जागे असावेत. आता माझीही
झोप बरीच छान झाली होती, म्हणून मीही जागीच होते.
अंदाजे पहाटे
०३.३० वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावात पोहोचलो. बाहेर किर्र
अंधार. एका घराजवळ आमची बस थांबली आणि गावातल्या ज्या गाईडला आम्ही सोबत घेऊन
जाणार होतो, त्याचे घर कुठे आहे, हे विचारायला अक्षय खाली उतरला. फोन लावण्याचा
प्रयत्न असफल ठरला कारण नेटवर्कचा प्रोब्लेम. म्हणून नाईलाजास्तव समोरच असलेल्या
घरामध्ये तो विचारायला गेला. घराचा दरवाजा उघडला आणि एक व्यक्ती बाहेर आली, त्याला
विचारपूस करता तो अक्षयसोबत त्या गाईडला आणायला घेऊन गेला. काही जण त्याच्यासोबत
खाली उतरले आणि बाकीचे आम्ही बसमध्येच बसून होतो. काही वेळातच अक्षय त्या गाईडला
घेऊन आला आणि त्याने सगळ्यांना आपापल्या बॅक सॅक घेऊन बसमधून उतरायला सांगितले.
आम्ही सगळे खाली उतरून गोल करून उभे राहिलो. नेहमीप्रमाणेच ट्रेक सूचना, नाईट
ट्रेक असल्यामुळे काही आवश्यक सूचना, आपापली ओळख करून देणे; यासोबतच “गडावर
जाणाऱ्या मार्गात जंगली श्वापदं नाहीत, पण जनावर असू शकतं. त्यामुळे चढताना असं कोणालाही
दिसलं, तर घाबरून न जाता लीडरला शांतपणे सांगणे”; ही अत्यंत महत्त्वाची सूचना
अक्षयने दिली. थोड्याच वेळात ग्रुप बनवून न चढता एकाच ओळीत पुढे रसिका त्यामागे
सर्व मुली आणि त्यामागे सर्व मुलं आणि शेवटी अक्षय याप्रमाणे आम्ही सगळे उभे राहून
counting केले आणि टॉर्च घेऊन गड चढायला सुरुवात केली. माझ्या स्वप्नातला गड मी
सत्यात चढत होते, एका हातात टॉर्च आणि एका हातात ती स्टिक घेऊन.
आम्ही एका ओळीत
व्यवस्थित चढत होतो. मध्येच काही वेळ थांबत, घोट पाणी पिऊन, परत एकदा counting
करून आम्ही चढत होतो. रसिका चढण्याच्या मार्गावरच्या सूचना मागे पास करत होती,
तसेच आम्ही आमच्या मागे पास करत होतो. हळूहळू उजाडायला लागलं होतं, त्यामुळे रस्ता
स्पष्ट होत चालला होता. आम्हाला उजेड व्हायच्या आधी कोकणकड्यावर पोहोचायचं होतं,
कारण तिथून सूर्योदय पाहणे म्हणजे पर्वणीच. त्यामुळे आम्ही झपझप चालत होतो.
सुरुवातीला मी थोडी मागे होते, पण नंतर पुढे असलेल्या रसिका आणि करुणाच्या मागून
चालत होते. अंदाजे २ तासात आम्ही गडावर म्हणजेच राजा हरिश्चंद्रगडावर पोहोचलो. मी
स्वप्नात पाहिलेला गड सत्यात पाहत होते. खरंतर मला स्वप्नात असल्याचाच भास होत
होता. नुकतीच सकाळ झाल्यामुळे गडावर अंधुक प्रकाश होता. त्या प्रकाशातच मी
गडावरच्या वास्तूंचे थोडे फोटो काढले, तिथे ‘राजा हरिश्चंद्रगड’ अशी पाटीही दिसली
त्याचाही फोटो काढला. येताना याच मार्गाने परत येणार असल्यामुळे ‘बाकीचे फोटो
येताना काढू’, असे ठरवून आधी कोकणकड्यावर पोहोचायचे ठरवले, कारण उगवलेला सूर्य आपले
दर्शन देण्यासाठी आमची वाट पाहत होता (याचे कारण आम्ही कोकणकड्यावर पोहोचल्यावरच
आम्हाला त्याने दर्शन दिले.) अहो भाग्य आमचे! २० मिनिटे पायपीट करून आम्ही सगळे
कोकणकड्यावर एकदाचे पोहोचलो.
काय वर्णन करावे
तिथल्या आणि तिथून दिसणाऱ्या सौंदर्याचे. कितीही केले तरी कमीच पडेल. अवर्णनीय!
मला तर अजूनही विश्वास बसत नव्हता, की मी हरिश्चंद्रगडावरून कोकणकडा पाहत होते. परत
एकदा OMG!
एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती
विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा
इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी
कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु
त्याच प्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे. हरिश्चंद्रगडाला
दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही
प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण
लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.
आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८
मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे
यांची नियुक्ती केली. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची
विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या
जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल
इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी
झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे
इत्यादी प्राणी आढळतात. तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची
खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर
आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला
हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.
हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी
येथील शिखरांची नावे
असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी
जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या
केली होती.
गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा
प्रचलित आहेत. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.
· खिरेश्वरकडील वाट - खिरेश्वरकडील वाट सोपी
असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर
असा राजरस्ता माळशेज घाटातून
जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहून आळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट
मार्गे
खुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर
खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे.
खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे
विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून
अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातील
यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टिका बसवलेली
आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव
शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रती,
अशा अनेक कोरीव
प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे
मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात.
·
एक
वाट ही तोलार खिंडीतून सुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते.
·
दुसरी
वाट ही गडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र
वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून
पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
·
नळीची वाट - नळीची वाट
बेलपाड्यातून(मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा) हरिशचंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल दहा-बारा तासांचा
प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाइंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो.
·
सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग - गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले
असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत
असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे
माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा' या
कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने
कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस
लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही
म्हणतात.
· पाचनईकडील वाट - हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट
पाचनई मार्गे
अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या
गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील
राजूर या
गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.
·
राजुर-पाचनई
अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या
पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे.
पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे.
·
हल्लीच
राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट
राजूर, अंबीत,
पाचनई, मुळा नदीचे खोरे,
घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा
आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही
पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व
परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प
असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे
जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर
घेऊन जाते. खिंडीतून चढणार्या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून
अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.
·
तोलार खिंड - हरिश्चंद्रगडाचा
माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला
इंग्रजी 'यू'
आकाराची खिंड आहे. ही खिंड
म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय.
ही खिंड पुणे आणि
नगर जिल्ह्यांमधील
दुवा आहे. येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास आजही देदीप्यमान
आहे. येथून
पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी
दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.
·
कोकणकडा - हे या किल्ल्याचे
सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. तीन हजार फूट खाली
कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर
झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून
कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा
रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल
आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी,
सिंदोळा,
जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच
भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे
किल्ले दिसतात.
गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत
असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे
वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे
सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची
सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले
होते.
आम्ही सगळे
तिथेच तब्बल दोन तास निवांत बसलो होतो. आम्ही सगळ्यांनी भरपूर फोटो काढले. गप्पा
मारल्या. तिकडे जवळच अक्षय बाकी सगळ्यांसोबत फोटो आणि गप्पांमध्ये रंगला आणि इकडे
मी-रसिका-करुणा-हर्ष गप्पांमध्ये रमून गेलो होतो. एकीकडे तिथल्याच एका झोपडीवजा
घरामध्ये आमचा नाश्ता तयार होत असल्यामुळे आम्ही इथेच थोड्या वेळ आराम केला. निसर्गाचे
रौद्र पण तितकेच मनमोहक सौंदर्य बघून मन अगदी प्रफुलीत होत होतं. नाश्ता तयार
झाल्याची सूचना आल्यामुळे अक्षयने सगळ्यांना त्या घराकडे यायला सांगितले. आम्ही ते
कड्याचे आणि आजूबाजूचे सौंदर्य मनात आणि डोळ्यात साठवून नाश्त्याच्या ठिकाणी गेलो.
अक्षयने सगळ्यांना सांगितले, की “भरपूर नाश्ता करा, कारण जेवण संपूर्ण गड फिरून
झाल्यानंतर खाली उतरल्यानंतर जिथे आम्ही पहाटे बसमधून उतरलो होतो तिथे जाऊनच
करायचं आहे.” नाश्ता करून, चहा पिऊन आम्ही सगळे पुढच्या टप्प्यावर जायला तयार
झालो. तो होता, महाराष्ट्रातल्या ४ थ्या उंच शिखर सर करण्याचा, म्हणजेच शिखर
तारामती! कालपर्यंत ज्याचे फक्त नाव मी ऐकले होते, ते आता मी प्रत्यक्ष चढणार
होते! मनात आनंदाच्या उकाळ्या फुटत होत्या. कड्यापर्यंत जाताना जो मार्ग होता,
त्याच मार्गाने आम्ही पहाटे पाहिलेल्या देवळापर्यंत आलो आणि तिथूनच पुढे
तारामतीकडे जायला निघालो. मध्येच थोडा एक टप्पा उतरताना मी स्वतः कोणाचाही आधार न
घेता माझ्या स्टिकच्या साहाय्याने खाली उतरले, हे पाहून अक्षयने माझे ‘Five’ ची
टाळी देऊन कौतुक केल्याचे ऐकून अजून जोश आला.
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्. शिखराच्या
पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य
आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही
राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट
आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून
समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश
न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन
शिवलिंगे आहेत.
तारामतीवर
जाण्याचा मार्ग तसा काही ठिकाणी अगदीच सोपा आणि काही ठिकाणी अगदीच रिस्की आहे, पण
चढताना मजा येत होती कारण सर केल्यानंतर होणारा आनंद मोठा असणार होता. अर्ध्या
ट्रेकमेट्सना पुढे अक्षय चढायला मदत करत होता आणि मागे रसिका आम्हाला. त्या
दोघांची लीडरशिप तर कमालंच! त्यांच्यामुळे भीती पळून जात होती. माझ्या हातातल्या
स्टिकचा मला इथे तारामतीवर चढताना खूप आधार मिळत होता. आमच्यामध्ये जो सर्वात लहान
म्हणजे तो छोटा ‘प्रचेत’, तो तर आमच्याही पुढे भरभर चढून कधीच शिखरावर पोहोचला
होता. अंदाजे अर्ध्या तासात आम्ही फक्त एकदाच मध्ये थांबून दम खात शिखर सर केले. वरती
पोहोचल्यावर अक्षय एक-एक करत सर्वांना शिखर सर केल्याबद्दल अभिनंदन करत होता. मी
पोहोचल्यावरही मला त्याने हाताने ‘Five’ ची टाळी देत माझेही अभिनंदन केले. मग मीही
‘फत्ते’ म्हणून माझा आनंद व्यक्त केला. जो नजारा दिसला, त्यासाठी तर शब्दही अपुरे
पडतील! सह्याद्रीचे रौद्र, भयंकर, अप्रतिम, अचंबा वाटण्यासारखे हे रूप डोळ्यात
भरून घेत मी आश्चर्याने सगळीकडे पाहत होते. अर्धा तास आम्ही तिथेच बसलो.
झेंड्याच्या जवळ अक्षयने शिवगर्जना दिली, आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले, सोबत
आपापलेही सेल्फी काढले. थोडा वेळ तिथेच आराम करून परत खाली उतरायला लागलो. चढताना
जो शेवटचा एक रिस्की टप्पा होता, तिथून न उतरता झेंड्याच्या मागून एक सोपा टप्पा
होता तिथून उतरायला सुरुवात केली. अंदाजे एक एक तासात आम्ही परत गडावर आलो. आता आम्ही सगळे गडावरती असलेल्या
वास्तू पाहायला गेलो.
·
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर - येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर
पायथ्याला लेणी कोरलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये
पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर
कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या
धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी
पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येते.
·
ऐतिहासिक महत्त्व - महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून
हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या
किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून
याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या
नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर हि या
जमातीचे प्रतीक आहेत. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या
लढ्याचे हे के प्रतिक आहे.
१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला
आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत
आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा
तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही
म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात
अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे.
या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक
चौथरा आहे. या चौथर्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या
खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे
वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके
चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज
(तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम
पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिद्ध गणी
विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता
। सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ
ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि
तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या
प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री
चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.
मग आम्ही तिथेच
जवळ असलेल्या एका छोट्याशा दुकानात जाऊन तिथे त्याच टाकीतल्या पाण्याचे थंडगार
लिंबूपाणी प्यायले. आम्ही आणलेल्या पाण्याच्या काही बॉटल्स रिकाम्या झाल्या
होत्या, त्यामुळे मी आणि अजून एक ट्रेक मेट त्या बॉटल्स घेऊन जाऊन तिथेच असलेल्या
टाक्यातले थंडगार पाणी भरायला गेलो. ते थंडगार पाणी पिऊन आमची तहान तर शमलीच पण
त्या पाण्याच्या थंडाव्यामुळे आलेला थकवा कुठल्या कुठे पळून गेला. परत येऊन मी
अजून एकदा एक ग्लास लिंबू पाण्याचा आस्वाद घेतला, तेव्हा कुठे तृप्त आणि Fresh
वाटलं. शरीर एकदम तरतरीत झालं होतं. सगळे ट्रेक मेट्स तिथेच थोड्या वेळ बसले होते.
गडावर काही लेण्यापण आहेत, त्या पहायच्या राहिल्या होत्या. मी विचार केला, की
‘अजून निघायला वेळ आहे, तोपर्यंत त्या लेण्या पाहून येऊ.’ म्हणून जायला निघाले,
जाताना रसिकाला सांगितलं. पण थोड्या अंतरावरच एक टाके आहे तिथे पण एक वास्तू आहे,
ती पाहायला गेले. तिथे जाऊन फोटो काढले. तेवढ्यात सुमन तिच्या मुलीसोबत आली, तिला
मी म्हणाले, “चला, आपण त्या लेण्या पाहून येऊ.” त्या पण “हो” म्हणाल्या. मग आम्ही
तिघी त्या लेण्यांकडेच जात असतानाच ट्रेक मेट पैकी कोणीतरी त्या दुकानातून हात
दाखवला आणि आम्हाला परत बोलावले. मग मी थोडेसे नाराज होऊन परत जायला निघाले.
नेहमीप्रमाणेच माझे काहीतरी पाहण्याचे राहूनच गेले. मग परत त्या दुकानात आलो आणि
अक्षयने “आता आपल्याला खाली उतरायचे आहे” असे सांगितले. मग परत आम्ही एका ओळीत उभे
राहून, counting घेऊन उतरायला सुरुवात केली. मला उतरतानाचा phobia असल्यामुळे
यावेळीही थोडी भीती वाटतच होती. मग अक्षयने माझ्या हातात असलेल्या स्टिकचा उतरताना
कसा उपयोग करून घायचा, ते सांगितले. त्यामुळे मी क्वचित काही टप्पे सोडून बाकी
पूर्ण रस्ता कोणाचाही हात न धरता त्या स्टिकचा आधार घेत खाली उतरले. मला याचा खूप
आनंद झाला. हे सगळं अक्षयच्या cheer up आणि योग्य गाईड करण्यामुळे शक्य झाले.
आम्ही खाली येऊन
एका ठिकाणी थोडा वेळ शांत, स्वस्थ बसलो होतो. थकलेले शरीर आता जेवणाची आस करत
होते, कारण खूप भूक लागली होती. पण त्या प्यायलेल्या दोन ग्लास लिंबू पाण्यामुळे
आम्ही दीड तास पूर्ण गड खाली उतरलो होतो. हीच असते लिंबू पाण्याची ताकद! मग आम्ही
जेवणाची व्यवस्था असलेल्या घरी पोहोचलो आणि हात-पाय धुऊन, जेवण करून त्वरीर
बसमध्ये येऊन बसलो. दुपारच्या उन्हामुळे पाणी-पाणी होत होतं. मग थोड्या वेळात बस
सुरू झाली आणि हवेमुळे बरे वाटले. बस सुरू होताच मला झोप लागली. येतानाचा प्रवास
थोडा लांबला गेला, कारण ड्रायव्हर काका रस्ता चुकले होते. मग एका ठिकाणी थांबून
त्यांनी पुण्याचा व्यवस्थित रस्ता विचारला. मग आमची बस चुकीच्या रस्त्यावरून योग्य
रस्त्यावर येऊन पुण्याकडे मार्गस्थ झाली.
मनात आनंद,
समाधान आणि स्वप्नातला गड प्रत्यक्ष पाहून मिळालेले सुख; हे सर्व घेऊन मी
ट्रेकवरून परतले.
सह्याद्रीचे
रौद्र-सुंदर रूप पाहण्यासाठी, कोकणकड्यावरचा थरार अनुभवण्यासाठी, गडावरच्या
थोड्याच पण इतिहासाचा आणि सौंदर्याचा अप्रतिम नमुना पाहण्यासाठी, तारामतीचे उंच
शिखर सर करून आपली शारीरिक-मानसिक शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रत्येक ट्रेकरचे
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी भरभक्कम उभा असलेला असा महाराष्ट्रातला अतिप्रचंड, जो
आयुष्यात संधी मिळेल तेव्हा किंवा एकदा तरी करावा असा गडांचा राजा असणारा माझा
स्वप्नील गड –
राजा
हरिश्चंद्रगड!
पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!