किल्ले भोरगिरी ते भीमाशंकर मंदिर
fORT bHORGIRI tO
bHIMASHANKAR tEMPLE
ठिकाण – भोरगिरी – पुणे – महाराष्ट्र – भारत
भीमाशंकर
– खेड – पुणे – महाराष्ट्र – भारत
उंची – किल्ले भोरगिरी – ६८६ मी.(२२५० फूट)
डोंगररांग – भीमाशंकर
प्रकार – किल्ले भोरगिरी – गिरिदुर्ग, भीमाशंकर – जोतिर्लिंग
जवळचे गाव – किल्ले भोरगिरी – भोरगिरी, भीमाशंकर – खेड
राजगडच्या ट्रेकनंतर ठरवलं होतं, की आता
पावसाळा संपेपर्यंत कोणताच ट्रेक करायचा नाही. पण असं काही ठरवलं आणि झालंय तर मग
काय. इंडिया ट्रेकचा लीडर सर्वेश मला राजमाचीच्या वेळेसच म्हणाला होता, की “तुझ्या
बहिणीला पण घेऊन येत जा.” त्यावेळेस मी तिला वॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड केल्यामुळे
सर्वेशकडे तिचा नंबर होता. त्यामुळे मला न सांगता त्याने शिल्पाला पुढच्या ट्रेकचा
मेसेज पाठवला आणि फोन करून ट्रेकसाठी कन्विन्सही केलं. तिने मला सांगितलं, की “आपण
जाऊया.” खरंतर पावसाळ्यात नाही जायचं ठरवलं होतं, पण शिल्पाची इच्छा मोडावीशी नाही
वाटली. मग मी पण तयार झाले. शिल्पा तर एक्सायटेड होती. साहजिकच आहे म्हणा. कारण
आधी तिने शिवनेरी आणि लोहगड ट्रेक केले होते. पण ते तसे सोप्पे होते. यावेळेस
पहिल्यांदाच ती ग्रुपसोबत येणार होती. इंडिया ट्रेकचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म
भरला आणि मग सर्वेशने आम्हा दोघींना वॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड केलं. “पैसे पगार झाला की देईन” असं मी सर्वेशला सांगितलं. तो ओके
म्हणाला. आमची ट्रेकची तयारी सुरू झाली. माझं तर नेहमीचच असल्यामुळे माझी तयारी
होतीच, पण शिल्पाला ट्रेक शूज घेण्यापासून तयारी होती. मग काय, एक दिवस गेलो
बाटाच्या दुकानात आणि घेतले मस्त ट्रेक शूज. शिल्पातर एकदम खुश आणि
एक्सायटेड!
ट्रेकचं नाव ‘भोभी’. म्हणजेच किल्ले
भोरगिरी ते भीमाशंकर. ट्रेकर्सच्या बऱ्याच आवडत्या ट्रेकमधला एक. मी आधी याबद्दल
ऐकलं नव्हतं. पण यानिमित्ताने कळालं. विचार केला, चला काहीतरी वेगळा ट्रेक करू
यावेळेस.
माझा ट्रेक मोहिमेतला बारावा गड आणि
सोळावा ट्रेक!
किल्ले भोरगिरी ते भीमाशंकर!
२९ जुलै २०१८ रविवार.
शनिवारी रात्री मी आणि शिल्पाने आमची बॅक
सॅक पॅक केली. सकाळी ५.४५ वा. गुडलक कॅफेजवळ आम्हा दोघींचं पीकअप ठरलं. आम्ही
वेळेवर पोहोचलो पण ट्रेक बसला यायला ६ वाजले. स्वारगेटवरून ट्रेक बस निघणार होती
आणि पीकअप करत पुढे जाणार होती. स्वारगेटवरून लीडर अमर येणार होता. ट्रेकला अमर
आहे म्हणल्यावर मजाच होती, कारण तो आमचा लीडर कम फोटोग्राफर होता. म्हणजे
पावसामुळे आम्हाला जरी फोटो काढता नाही आले, तरी त्याच्या DSLR मध्ये तो काढेल
याची खात्री होती. ६ वाजता ट्रेक बस आली. मी, शिल्पा आणि अजून एक मुलगी गुडलक वरून
चढलो. मी आणि शिल्पाने ड्रायवरच्या मागची पहिली सीट पकडली आणि आमची बस पुढे
निघाली. नेहमीप्रमाणे मला बसमध्ये बसल्या बसल्या झोप लागली. मी शिल्पाला सांगून
ठेवलं होतं, की सर्वेश नाशिक फाट्यावरून चढेल तेव्हा मला उठव. यावेळेस शिल्पा
माझ्यासोबत असल्यामुळे मला खूप आनंद होत होता. नाशिक फाट्यावरून सर्वेश आणि बाकीचे
ट्रेकमेट्स चढले. आम्ही अंदाजे २ तासात ब्रेकफास्ट साठी एका हॉटेलपाशी उतरलो. मस्त
नाश्ता केला आणि भोरगिरी गावाकडे आमची बस निघाली.
काही वेळेतच भोरगिरीच्या जवळ बस थांबली
आणि आम्ही गरज असलेलं सामान घेऊन खाली उतरलो. बाकीचं सामान बसमध्येच ठेवलं. तिथेच
असलेले कोटेश्वर मंदिर पाहायला गेलो. आमचं फोटो काढणं इथूनच सुरू झालं. आत्तातरी
पाऊस नव्हता. मंदिर पाहून लगेचच भोरगिरी किल्याकडे निघालो. त्याआधी ट्रेकच्या
नेहमीच्या सूचना, सर्वांची ओळख आणि ट्रेकचा रूट लीडरने सांगितला आणि आमचा भोरगिरी
ते भीमाशंकर ट्रेक सुरू झाला.
आधी आम्ही भोरगिरी किल्यावर गेलो. आधी
मला वाटले, की शिल्पा येईल की नाही किल्यावर, पण किल्ला चढायला सोपा होता.
किल्यावर चढायला नॅचरल रूट असल्यामुळे शिल्पा माझा हात धरून चढू लागली. वरती दोन
गुहा आहेत. तिथे पोहोचल्यावर आम्ही भरपूर फोटो काढले. उतरताना मात्र तिने माझा हात
कमीत कमी वेळा धरून मला आश्चर्याचा धक्काच दिला.
पुणे
जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे.पुण्याच्या उत्तर
भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरुनगर.क्रांतिकारक
राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेड गावाचे नाव बदलून
राजगुरुनगर असे ठेवण्यात आले.राजगुरुनगर हे
तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या
महामार्गावर,भीमा
नदीच्या उत्तरतीरावर वसलेले आहे.शिवाजी
महाराजांच्या काळी मोगल साम्राज्याची सीमा भीमा नदीपर्यंत भिडलेली होती.भीमा नदीचा उगम
सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती
राजगुरुनगर येथे येते.या
भीमा नदीच्या खोर्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला आहे.भोरगिरी किल्ला
छोटेखानी असून,पावसाळ्यात
येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते.भोरगिरी ते
भीमाशंकर हे फक्त सहा किलोमीटरचे अंतर आहे.तो एक सुंदर ट्रेक
आहे.डोंगरधारेजवळून
रमतगमत करता येणारा.या
संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात. भोरगिरीचा
किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर असली,तरी पायथ्यापासून
तो जेमतेम दीडशे मीटर आहे. भोरगिरी नावानेच
परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे.राजगुरुनगरपासून
साधारण ५५ किलोमीटर अंतरावर भोरगिरी आहे.
येथे भीमेच्या
काठावर कोटेश्वर मंदिर आहे.या कोटेश्वर
मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की,देवांनी इथे
असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते.त्यामुळे तो डोह
पवित्र झाला आहे.म्हणून
आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात.झंझराजाने जी बारा शिवालये
बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे,असे मानले जाते.कोटेश्वर मंदिरात
शिवपिंडी तर आहेच; पण
गाभार्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिषट्यपूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट
उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुली स्कर्ट
नेसतात तशीच रचना त्याच्या वस्त्राची दिसते. ही वेशभूषा
पाश्चात्त्य वाटते. तुंदिलतनू
असलेला हा गणेश उभा आहे. तो
चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो; तर वरच्या डाव्या
हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड
त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी
असलेली ही गणेश मूर्ती त्याच्या वस्त्रामुळे निश्चितच वेगळी ठरलेली आहे. किल्ल्यावर ९व्या
शतकात खोदलेल्या गुहा आहेत. पहिल्या गुहेचे ओसरी आणि मुख्य गुहा (गर्भगृह) असे
दोन भाग आहेत. ओसरीच्या दोनही बाजुला पाण्याची टाक आहेत. गुहा चार खांबांवर तोललेली असुन आत देवीची मुर्ती बसवलेली आहे. गुहेच्या डाव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्या शेजारी पिंडी व नंदी
आहे. पहिल्या गुहेच्या पुढे दुसरी गुहा आहे. दुसरी गुहा प्रशस्त आहे. या
गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत. ओसरी चार खांबांवर तोललेली आहे. ओस्ररीत दोन पिंडी आणि नंदी आहेत. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. या गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा आलेल्या वाटेने परत जाऊन गुहेच्या
विरुध्द दिशेला असलेल्या पायवाटेने (डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला
ठेउन) डोंगर चढायला सुरुवात करावी. पाच मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतून गडमाथावर प्रवेश करतो. समोरच एक सातवाहानकालिन पाण्याचे टाक आहे. या टाक्याचे तीन भाग असून दोन भागात पाणी आहे. तर तिसरा भाग कोरडा आहे. या
कोरड्या टाक्यात एक वीरगळ ठेवलेली आहे. हे
टाक पाहूम डाव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात केल्यावर एक पाण्याच कातळात
खोदलेल पण बुजलेल टाक दिसत. या
टाक्याच वैशिष्य़ म्हणजे त्याच्यावर एक शंकराचे छोटी पिंड कोरलेली आहे. पुढे गेल्यावर काही अंतरावर पाण्याच जोड टाक आहे. डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर पाण्याच एक टाक आहे. या टाक्याच्या बाजूला एक पूर्ण झिजलेली मुर्ती शेंदुर फ़ासून
ठेवलेली आहे. किल्ल्याच्या डोंगरावर गर्द झाडीत काही
पिंडी आणि वीरभद्राची भंगलेली मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या पिंडींच्या अलिकडेच एक वाट खाली उतरतांना दिसते. या पायवाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे गेल्यावर कातळात खोदलेल्या
पायर्या व एक बुजलेली गुहा पाहायला मिळते.ती
पाहुन परत पायवाटेवर आल्यावर डाव्या बाजूला पायवाट खाली उतरते तिथे उध्वस्त
प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. या
प्रवेशव्दारातून जाणारी पायवाट भिमाशंकरला जाते. तेथे एक शंकराचे
देऊळ आहे. किल्ल्यावर
जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची
कुंडे दुथडी भरून वहात असतात. गडावर गडपणाचे
तुरळक अवशेष आहेत. गडाच्या
दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर
पाण्याची टाकी आहेत.
भोरगिरी पाहिल्यानंतर आम्ही तिथेच जवळ
असलेल्या भीमा नदीच्या प्रवाहाजवळ जाऊन तिथेही फोटो काढले. समोरच छोटा-मोठा धबधबा
दिसला. नंतर कळले, की ३ दिवस पाऊस नसल्यामुळे नदीचा प्रवाह कमी आणि धबधबाही जास्त
नव्हता. तिथे अर्धा तास काढल्यानंतर आम्ही भीमाशंकर कडे निघालो. आधी जंगलाचा थोडा
चढ आणि मग मध्येच सपाट रस्ता, परत जंगल, मग परत सपाट रस्ता असा रूट होता भीमाशंकर
पर्यंतचा. अर्धा रस्ता पार केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सर्वेशने आणलेले जेवण केले.
मी सोबत डबा आणला होता तो खाल्ला. वेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण
होते. त्यामुळे वेजवाले आणि नॉनव्हेजवाले दोघेही खुश.
भोरगिरीवरून निघाल्यानंतर
काही मिनिटांतच आपल्याला पहिल्या टेकडीवर पाय-यांची वाट लागते. याच वाटेने छोटी
टेकडी पार केल्यावर आपण पुन्हा सपाटीवर येतो. जेवण झाल्यावर आम्ही पुढे निघालो. या सपाटीवरून पुढे चालत राहिल्यास तीन मोठे ओढे
आपल्याला पार करावे लागतात. ओढे कसले जणू काही छोटय़ा नदय़ाच म्हणा! ऐन पावसाळयात
चहुबाजूंच्या डोंगरद-यातून वाहत येणा-या या ओढयांचे रूपांतर जणू काही नदीतच झालेले
दिसते. हे ओढे अगदी जीवाच्या आकांताने आपली वाट अडवून धावत असतात. त्यामुळेच हे
ओढे थोडे साहस आणि तेवढीच सावधानता बाळगून पार करावे लागतात. थोडासा चढ पार केल्यानंतर मग थोडा उतार
लागला आणि आम्ही पोहोचलो गुप्त भीमाशंकरला. तिथे थोडं खाली धबधबा होता. बरेच जण खाली
भिजत होते आणि मी थोडं लांब उभं राहून त्यांचे फोटो काढले. मग आम्ही तिथे भरपूर
फोटो काढून पुढे निघालो. पुढे फक्त जंगलाचा रस्ता होता. शिल्पाचा हा इतका मोठा
ट्रेक असल्यामुळे ती थोडी थकली होती. त्यामुळे ती आणि मी हळूहळू पुढे जात होतो.
तसंही आमच्या मागे लीडर सर्वेश आमच्यातल्याच एका ५-६ जणांच्या टंगळ-मंगळ ग्रुपला
घेऊन मागून येत होता. आमचे आता ४ ग्रुप वेगळे झाले होते. मध्ये वेगवेगळ्या टप्यावर
थांबून आम्ही भरपूर फोटो काढले होते. पाऊस नसल्यामुळे आम्हाला फोटोही खूप काढता
आले होते. जंगलाचा लांब रस्ता पार करून एकदाचे आम्ही भीमाशंकरला पोहोचलो.
भीमाशंकर हे
पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा
ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख
नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी
श्रद्धा आहे. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट
अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे
विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी
म्हणजे शेकरू. म्हणजे
उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते.
बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय
घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक
प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे म्हणजे -
· गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात
साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त
भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
· कोकण कडा- भीमाशंकर
मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे.
येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू
शकतो.
· सीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट
जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
· नागफणी - आश्रमापासून
नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची
उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे
दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
भिमाशंकर हे खुप सुंदर ठिकाण आहे. भीमाशंकर
येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे.
दर्शन घेणं शक्य नव्हतं, कारण गर्दी खूप
होती. मग आम्ही सगळ्यांनी कळसाचे दर्शन घेतले आणि बाहेर पडायला सुरुवात केली.
जवळपास ३०० पायऱ्या चढून देवळाबाहेर पडायचे होते. पाय थोडेसे दुखत असल्यामुळे
आम्ही हळूहळू चढत चढत एकदाचे बाहेर आलो. वर आलो तर फक्त धुकं होतं. आजूबाजूचा
परिसर स्पष्ट दिसत नव्हता. काय मस्त वातावरण होतं ते! तिथे मग आम्ही बाकी मागे
येणाऱ्या ट्रेकमेट्स ची वाट पाहत होतो. ते थोड्याच वेळात आले आणि मग आम्ही आमची बस
जिथे पार्क केली होती तिथे म्हणजे अंदाजे ३ किमी चालून बसपर्यंत पोहोचलो. (तसं
लीडर देवाने आम्हाला फक्त १ किमी सांगितले होते. असो.) येताना परत त्याच हॉटेलात
उतरून चहा-फराळ करून आमची बस पुण्याकडे निघाली. हा ट्रेक करून मी खुश होतेच पण
शिल्पा सोबत आल्यामुळे अजून खुश होते. तिनेही ट्रेक खूप एन्जॉय केला.
असा हा खरच ट्रेकर्सला आवडणारा, लांब
प्रवास केल्यासारखा वाटणारा, मध्येच लागणारे धबधबे – पाण्याचे ओहोळ – घनदाट जंगल
असा मार्ग आणि एकदा तरी करावाच असा –
किल्ले भोरगिरी ते भीमाशंकर मंदिर!
पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
No comments:
Post a Comment