किल्ले राजमाची
fORT rAJMACHI
ठिकाण – राजमाची – पुणे – महाराष्ट्र – भारत
उंची – ८२६ मी. (२७१० फूट)
डोंगररांग – सह्याद्री
प्रकार – गिरिदुर्ग
जवळचे गाव – लोणावला
बऱ्याच महिन्यांपासून मनात होतं ‘राजमाची’
करायचं. ‘इंडिया ट्रेक’च्या
व्हॉट्सअप ग्रुपवर राजमाची ट्रेक चा मेसेज आला. अगदी ट्रेकच्या दिवसापर्यंत माझं
फिक्स होत नव्हतं. अगदी ग्रुपवर चॅट करताना एक ट्रेकमेट किशनने तर स्वतः मला मेसेज
करून यायचा आग्रह धरला. तरी मन तयार होत नव्हतं. मी तर सर्वेशला ऑफिसचं काम
असल्याचं सांगून टाळायचा प्रयत्न करत होते. पण मग सर्वेशने आग्रह धरला आणि तयार
झाले.
माझा चौथा नाईट ट्रेक आणि
माझा ट्रेक मोहिमेतला दहावा गड आणि चौदावा ट्रेक!
किल्ले राजमाची!
०९-१० जून २०१८ शनिवार-रविवार.
शनिवारी ऑफिसमधून लवकर निघाले आणि घरी येऊन बॅक
सॅक पॅक केली. ०७.३० च्या लोणावळा लोकलने जायचं ठरलं होतं,
पण मला घरून निघायला उशीर होत होता. म्हणून मग मी सर्वेशला फोन केला, की “मला ०७.३० लोकल भेटणं शक्य नाही.” तर तो
म्हणाला, “०८.०० च्या लोकलने आलं तरी चालेल”.
मग मी “कोणाला तरी शिवाजीनगरला माझ्यासाठी थांबायला सांग” असे सर्वेशला सांगितले, तर तो म्हणाला,
की “पूजा आणि किशन थांबतील”. मग मी कॅबला यायला उशीर होईल,
म्हणून मग ऑटोने शिवाजीनगरला पोहोचले आणि लोकलला यायला उशीर आहे हे पूजाकडून
कळल्यावर मन स्थिर झालं. पूजा आणि किशन प्लॅटफॉर्मवर माझीच वाट पाहत होते. मला
पाहून त्यांनाही आनंद झाला. मग पूजाने माझं तिकीट काढलं आणि आम्ही लोकलची वाट पाहत
गप्पा मारत बसलो. आमच्या आधी दोन-तीन जण आधीच्या लोकलने पुढे गेले होते. त्यांनी
ग्रुपवर सेल्फी पण पाठवला होता. मी खाण्यासाठी सोबत २-३ बिस्कीट पुडे घेतले.
थोड्याच वेळात ०८.०० ची लोणावळा लोकल आली आणि आम्ही जनरल डब्यात चढलो. लोकल गच्च
भरली असल्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळाली नाही. मग आम्ही तिघे तसेच गर्दीमध्ये
थोड्याशा जागेमध्ये कसेतरी उभे राहिलो. पूजाने सर्वेशला फोन करून आम्ही गाडीत बसल्याचे
सांगितले, तर तो म्हणाला “तुमचा सेल्फी काढून
ग्रुपवर पाठवा”. मग आम्ही त्या गर्दीमध्येही सेल्फी काढून ग्रुपवर पाठवला. सर्वेश
आणि काही अजून ट्रेकमेट्स आकुर्डी स्टेशनवरून दुसऱ्या डब्यात चढले. आकुर्डी स्टेशन
गेल्यावर मात्र गर्दी अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाली आणि मला बसायला जागा मिळाली.
अजून एक-दोन स्टेशननंतर पूजा आणि किशनलाही बसायला जागा मिळाली. मग मीही
त्यांच्याशेजारी जाऊन बसले. मला खिडकीची सीट मिळाली होती,
त्यामुळे थंड वारा नुसता झोंबत होता. मला वाटलं गर्मी असेल, म्हणून मी थंडीला संरक्षण म्हणून काहीच घातलं
नव्हतं. त्यामुळे कुडकुडतच बसले होते. माझ्यासोबत असलेले दोघं म्हणजे पूजा आणि
किशन. पूजा हिने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने राईड केली होती आणि किशन
दोन दिवसापूर्वीच बेंगलोरहून नोकरीनिमित्त पुण्याला आला होता. त्याचा हा पहिलाच
ट्रेक होता, त्यामुळे तो खूपच एक्सायटेड होता.
०१.३० तासाचा प्रवास केल्यानंतर लोणावळा स्टेशन
आलं. आम्ही तिघे उतरलो आणि पुढच्या डब्यात असलेले सर्वेश आणि बाकी ट्रेक मेट्स तिथे
भेटले. मग आम्ही लगोलग स्टेशनच्या बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या एका छोट्याशा
हॉटेलात गेलो आणि रात्रीचे हलकेसे जेवण केले. अर्धा तासानंतर आम्ही सर्व
राजमाचीकडे निघालो. हा फक्त ट्रेक नव्हता तर काजव्यांचा उत्सव होता. पावसाच्या आधी
येणारे हे काजवे पाहण्याचा योग मिळाला होता. आत्तापर्यंत मी फक्त काजवे इंटरनेटवर
पहिले होते आणि माहिती वाचली होती, पण प्रत्यक्ष कधी पाहिले नव्हते. ते
आता पाहायला मिळणार होते, त्याची उत्सुकता होती. जसजसे आम्ही
लोणावळ्यापासून दूर जायला लागलो, तसतसे आजूबाजूच्या झाडांवर आम्हाला
चमकणारे काजवे दिसायला लागले. ते पाहून आनंदाला उधाण आलं होतं. मग आम्ही प्रत्येक
झाडावर काजवे पाहायला लागलो. इतक्या मोठ्ठ्या प्रमाणात काजवे पाहून डोळेही आनंदाने
चमकायला लागले होते. सर्वेशनी आम्हाला सांगितले,
की “आपण शांत उभे राहून पाहूया, म्हणजे ते मोठ्ठ्या प्रमाणात
दिसतील”. आणि तसेच झाले. आम्ही त्यांचे चमकणे मोबाईलच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड
केले. राजमाचीकडे जाताना प्रवासात आम्हाला काही जंगली मित्रही दिसले. म्हणजे विंचू, खेकडा, कोळ्याचे घर,
मुंग्यांचे वारूळ; इतकेच नव्हे तर आम्हाला सुंदर अशी
धामण पण दिसली. काय सुंदर होती ती! मी नेहमी विचार करायचे,
की मला कधीतरी एखादा साप दिसावा आणि तो आता दिसला. काय आनंद झाला होता! ४ तास
चालून आम्ही राजमाचीवर पोहोचलो. पहाटेचे ४ वाजले होते. मग आम्ही तिथेच एका ठिकाणी
आराम करायचा ठरवला. आमच्याप्रमाणेच बरेच ग्रुप तिथे आले होते. तशी राजमाचीवर
नेहमीच गर्दी असते असं ऐकलं होतं. थकून गेल्यामुळे आम्ही काही जण झोपी गेलो.
पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला
दिनांक २६ एप्रिल, इ.स.
१९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित
स्मारक म्हणून घोषित केलेले
आहे. सह्याद्रीच्या लोणावळा-खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच 'उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या
प्रदेशात मुंबई-पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची
किल्ला वसलेला आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या
बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा
नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे
या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण
करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा
उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख'
किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार
केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील
तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक
चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा
सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं
असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन
स्वतंत्र असे किल्लेच होय. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे.
यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे
या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व
दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात
कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि
सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली
झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा.
राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर
त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील
राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल
करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे
वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण
प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या
तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि
आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.
राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे
मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी
किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला
इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर
करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात
दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन
तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी
कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या
आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या
पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख,
मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये
बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या
उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन
शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा
(पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या
गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या
दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून
पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे,
एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर
व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी Rajmachi Rural Aid
and Development Programme या स्वयंसेवी
संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई
करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे,
अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या
दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कँपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे. गिरी भ्रमंतीची व दुर्ग भ्रमंतीची ज्यांना आवड आहे
त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ आहे. उल्हास नदीच्या या पात्रात
कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठा दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला
असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी
येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१
वर दिला आहे. या परिसरात याला 'जिजाऊ कुंड 'म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रध्देने सूर्यस्नान करतात.
सकाळी ७ वाजता आम्ही उठलो आणि तिथे असलेल्या
उढेवाडी या गावात नाश्ता केला. सकाळचा तो रम्य देखावा,
पावसाळ्यातला तो चिंब परिसर, सगळीकडे हिरवळ आणि रात्री पाहिलेला
काजव्यांचा उत्सव; वाह!
नाश्ता करून आम्ही थोड्याच उंचीवर असलेल्या
राजमाचीवर पोहोचलो. तिथे आम्ही सगळ्यांनी खूप फोटो काढले. मग काही वेळात आम्ही
श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर जायला निघालो. गडाच्या पायऱ्या पुण्यातल्या पर्वती या
मंदिराच्या पायऱ्यांसारख्या आहेत, असे सर्वेशने सांगितले. सुरुवातीला
खोटं वाटलं, कारण सगळेच लीडर असंच सांगतात. पण
जेव्हा चढाईला सुरुवात केली तेव्हा सर्वेशच्या बोलण्यावर विश्वास बसला. जसजसं
आम्ही वर चढायला लागलो, तसतसं थंड वारा अंगाला झोंबत होता.
चढताना मला भीती वाटत होती, की या वाऱ्यासोबत मी उडून जाते की
काय! हळूहळू चढून आम्ही फक्त अर्ध्या तासात श्रीवर्धनवर पोहोचलो. वरती पोहोचल्यावर
जिथे झेंडा असतो तिथे जाऊन घोषणा करण्याचा विचार होता,
पण तिथली प्रचंड गर्दी बघून आम्ही तो विचार रद्द केला. मग तिथेच आम्ही काही फोटो
काढले आणि थोडा वेळ थांबून उतरायला सुरुवात केली. वरतून मी खाली पाहिलं आणि खाली
फक्त धुकं. पाऊस पडायला सुरुवात झाली होती. फोटो काढणं मुश्कील होतं. आमच्या
ग्रुपमध्ये असणारा आणि उनाड या ट्रेक ग्रुपचा लीडर अमर याने सोबत आणलेला डीएसएलआर
यावेळेस कामी आला. त्याने आमचे भरपूर फोटो काढले. किल्ल्यावरून दिसणारे ते उढेवाडी
गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहून मन प्रफुल्लीत आणि थक्क झालं. समोरच श्रीवर्धनचा
जोडीदार मनरंजन किल्ला दिसला. काही जण मनरंजन चढताना दिसत होते. आम्ही तिकडे नाही
चढलो. नेहमीसारखंच माझं काहीतरी पुर्णतेत अपूर्ण राहून गेलं असं वाटलं. असो.
लोणवळ्याहून
तुंगार्लीमार्गेराजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योधचे स्मारक ,अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती
आहे. किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.
किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला 'उधेवाडी' असे म्हणतात. उदयसागर तलाव :
पावसाळयात हा तलाव मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या
समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळयात दरीतून
पडणाऱ्या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते.हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत
कोळणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी
गुणगुणायला लागतात , पलिकडे
खळाळे निर्मळ निळसर पाणी उत्तुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे
ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी मनरंजन :
उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या
बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या
प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा
गोमुखी आहे.किल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या
वाडांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे.
या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत.
किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धन :
राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात
उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्यापैकी सुस्थितीत आहे.किल्ल्याला अनेक
ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते.दरवाजाची कमान बर्यापैंकी शाबूत
आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत.किल्ल्यावर जाण्याच्या
वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत .या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार
आहे.बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक
सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोटाचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर
दिसतो. शंकराचे मंदिर : तलावाच्या
पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे.या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले
पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी
हाती घेतलेले आहे.राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते.या
दरीतूनच उल्हास नदी उगम पावते.या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला 'भैरण डोंगर' म्हणतात.अशा निसर्गसौंदर्याने
नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले
श्रीवर्धन आणि मनरंजन .बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा
लागतात.श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे,यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे.
मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे.येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन
आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.
वर चढताना पाऊस लागला नाही, फक्त वारा लागला होता. पण खाली उतरताना मात्र
आम्ही सगळे चिंब भिजून निघालो. परत आम्ही उढेवाडीत पोहोचलो आणि तिथे आम्ही दुपारचे
चविष्ट जेवण केले. गरमागरम भाकरी आणि भाजी खाऊन पोटही आनंदाने भरून पावलं. जेवण
करून थोडा वेळ आराम करून आम्ही परत जाण्यासाठी निघालो. काही जण तिथेच एका गाडीत
बसून राजमाची वळणापर्यंत जाणार होते, पण मी,
सर्वेश आणि बाकीचे ट्रेक मेट्स चालतच
तिथपर्यंत जाणार होतो. त्याआधी आम्ही तिथेच जवळ असलेले मंदिर पाहायला गेलो. तिथेही
आम्ही फोटो काढले आणि परत मूळ वाटेवर येऊन परतीच्या वाटेवरून चालायला लागलो.
रात्री पाऊस नसल्यामुळे रस्ता तसा कोरडा होता,
पण सकाळपासून भरपूर पाऊस पडला असल्यामुळे रस्ता नुसता चिखलमय झाला होता. त्यामुळे
चिखलात शूज भिजवत, पच-पच असा आवाज काढत, घसरू नये म्हणून तोल सांभाळत, मजा-मस्ती करत,
गप्पा मारत आम्ही चालत होतो. माझी फेमस स्टिक माझ्यासोबत होतीच. तिने
नेहमीप्रमाणेच माझी यावेळीही साथ दिली. अर्धा रस्ता पार केल्यानंतर सर्वेशने पुढील
रस्ता पूर्ण करण्यासाठी गाडीची सुविधा करून दिली. मग आम्ही १०-१२ जण एकाच जीपमध्ये
कसेबसे बसलो. आमच्यापैकी किशन आणि दोन जण तर चक्क गाडीच्या बाहेर लटकत होते.
वळवळणाचा, चिखलाचा,
ओबडधोबड रस्ता पार करून आमची जीप अखेरीस मूळ रस्त्याला लागली. तिथे मग जे गाडीच्या
बाहेर लटकत होते ते खाली उतरले आणि पुढे ते ऑटोने पुढे जायला निघाले. मग आम्ही आणि
ऑटोतले बाकीचे त्या हॉटेलपाशी पोहोचलो, ज्या हॉटेलात आम्ही आदल्या रात्री
जेवण केलं होतं. मग आम्ही चहा पिऊन लोणावळा स्टेशनवर जायला निघालो. संध्याकाळची
मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसने आम्ही काही जण परतीच्या वाटेकडे जायला निघालो.
असा हा, मनात आला की कधीही जाऊन पाहण्यासारखा, दोन मजबूत किल्ल्यांनी वेढलेला, निसर्गसौंदर्याने नटलेला, खास पावसाळ्याच्या थोडं आधी काजव्यांचा उत्सव
साजरा करणारा, जंगली मित्रांशी भेट घडवणारा –
किल्ले राजमाची!
पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी
वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
No comments:
Post a Comment